" जगाच्या कल्याणा | संताच्या विभूती ||"

" जगाच्या कल्याणा | संताच्या विभूती ||"

img

भारतीय संस्कृतीचा संत आणि दैवी पुरूषांशी अनादी काळापासून संबंध आला आहे. महाराष्ट्राला संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे.त्यात एक नाव म्हणजे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी ) महाराज होय . त्यांचे प्रमुख कार्य श्री क्षेत्र जातेगाव ,वेरूळ, त्र्यंबकेश्वर ,नाशिक ,कोपरगाव , येथे आहे. महाराष्ट्र राज्यात संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यातील संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात दहेगाव म्हणून एक छोटेशे गाव आहे.या गावात मधील अतिशय श्रीमंत अशा उगले पाटील घराण्यात/परिवारात गुरुमाउली जनार्दन स्वामी (मौनगिरी )महाराज यांचा जन्म झाला.गुरुवार दि.२४ सप्टेंबर १९१४ शके १८३६ रोजी सकाळी ७:४५ वा. म्हाळसापोटी भगवान शंकराने निष्काम कर्म योगी जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी ) महाराज यांच्या रुपात जन्म घेतला. बाबाजींच्या वडिलांचे नाव "श्री आप्पाजी पाटील" व आईचे नाव "मातोश्री म्हाळसादेवी." म्हाळसादेवी ह्या टापरगाव ता.कन्नड येथील मोहिते पाटलांची कन्यारत्न होत्या.

img

|| उठा कामाला लागा || संपूर्ण विश्वाने ,विश्वासाने आणि आदराने नतमस्तक व्हावे अशी अतिशय दिव्य संस्कृती भारतात आहे. आजही असे दिव्य संस्कार ,दिव्य संत महापुरुष ,दिव्यज्ञान आणि दिव्य ग्रंथावली भारतात सहज सुलभतेने प्राप्त होते हि वस्तुस्थिती आहे.त्याच दिव्यसंत परंपरेतील एक अलौकिक अर्वाचीन महर्षी म्हणजेच निष्काम कर्मयोगी भगवान श्री जगद्गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज. जनसामान्यांना जडवादांच्या जीवनदृष्टीतून जागे करण्याचे महतकार्य जनार्दन स्वामींनी जन्मभर जाणीवपूर्वक जोपासलेले आहेत.दिनांक २४ सप्टेंबर १९१४ रोजी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पुण्यभूमीत सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या जनार्दन स्वामींचे अंगी श्रद्धा,शुचिता ,अस्मिता,द्या,प्रेम,परोपकर ,क्षमा अशा दैवी गुणांचे दर्शन त्यांच्या बालपणीच्याच आचार -विचारावून सर्वांना समजले होते. स्वामीजींनी प्रथम वारकरी सांप्रदायातील भक्ती प्रेम प्रमेयांची साधना करून अल्पकाळातच पतंजली योग सूत्राचे आधारे योगसिद्ध प्राप्त केली.जटाजूटवल्कलेदारी रुद्राक्ष , भस्म विभूषित अशी त्यागमूर्ती समोर पाहताच पाहणारे नतमस्तक होत.सान्निध्यात येणाऱ्या जनसामान्यांना जीवनसृष्टीत स्वर्गीय सौंदर्य संपन्नता आणि स्वानंद निर्माण करण्याचे प्रेरणादायी सामर्थ्य स्वामीजींचे अंगी होते.

निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांनी सर्व सामान्य लोकांना अध्यात्म परमार्थ शिकवला,सोप्या भाषेत विशेष म्हणजे ग्रामीण भाषेत वेदांताचा अर्थ सांगितला.दिशाहीन समाजाला दिशा दाखविली लहान मुलांना गुरुकुल पध्दतिचे शिक्षण. पडीत नापीक जमिनींची भाविकांकडून श्रमदानाद्वारे जमिनीचे लेवल ,सपाटीकरण करून फुलांच्या फळ्यांच्या बागा फुलविल्या.हजारो शिवमंदिराचे भूमिपूजन केले,गावोगावी,खेडोपाडी ,शहरी विभागात भक्त समवेत जावून प्रवचना द्वारे शिवभक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. कोणत्याही धर्माचा पंथाचा भेद केला नाही.संपूर्ण भारततीर्थ यात्रा केली (बारा ज्योतिर्लिंग , सप्तपुऱ्या ,चारधाम ,अष्टमूर्ती शंकर),आश्रमात भाविकांसाठी ,विद्यार्थी,वारकरी ,साधू ,संत ,अनाथ यांच्यासाठी मोठ मोठ्या इमारती व वसतिगृह निर्माण केले व स्वत:साध्या झोपडीत राहून जनता जनार्दनाची सेवा केली.सामुदायीक जप ,तप,अनुष्ठान ,यज्ञ ,पारायण , भजन आणि भोजन असा आग्रह असणाऱ्या स्वामीजींनी जनसामान्यांना अपार आनंदाचा आणि मौलिक मुल्यांचा सुलभतेणे लाभ करून दिला.

भारतीय संस्कृतीचा संत आणि दैवी पुरुषांशी अनादी कालापासून संबंध आहे.भारतीय इतिहासाची पाने ह्या मानवजातीच्या रक्षण कर्त्यांच्या स्तुतीने व आळवनीने भरलेली आहेत. महाराष्ट्रात फार मोठी संत परंपरा लाभली आहे. त्यात प्रामुख्याने संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर ,संत एकनाथ ,संत रामदास स्वामी ,स्वामी गजानन महाराज,साईबाबा हे तर त्या परंपरेतील भूषण आहेत. ह्याच परंपरेतील दुसरे नाव म्हणजे जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी )महाराज होय. श्री संत जनार्दन स्वामी वयाचे १७-१८ व्या वर्षी असतांना आईचे महानिर्वाण झाल्यानंतर श्री क्षेत्र अंदरसूलला १९४८ ते १९६४ या दरम्यान नागेश्वर शिवमंदिरात एक कप दुध व एक लवंग यावर सिद्धासनात 18/18 तास 16 वर्ष तपश्चर्या केली.वेद ,पुराण,गीता ,भागवत सर्व ग्रंथाचे अध्ययन व हटयोग,ध्यानयोग, करून श्री सदशिवाच्या साक्षात्कारापर्यंत उच्च स्थिती प्राप्त करून घेतली.श्री महामृत्युंजय भगवान शंकराच्या आदेशाने मग त्यानी जातेगाव येथील श्री पिनाकेशवर महादेव या जीर्ण शिवालयाचा जीर्णोद्धार केला.त्या ठिकाणी त्यांचे अनेक लीला साक्षात्कार ,जनतेला पाहण्यास मिळाले.बाबाजी हे दिव्य ईश्वर विभूती आहेत अशी अनेकांना अनुभूती आली.त्यानंतर फार मोठा लोकसंग्रह श्री बाबाजींच्या कृपाशिर्वादाने त्याठिकाणी प्राप्त झाला.

त्याठिकाणी दररोज नित्यनियमविधी पाठ त्यानंतर प्रवचन ,संस्काराचे पाठ,यज्ञ याग,जपअनुष्ठान, अशा परमार्थी मुल्यांची समाजातील समान्य घटकांकडून करून घेतले.तसेच कार्य श्री क्षेत्र वेरूळ ,पालखेड,पुणतांबा,नासिक ,त्र्यंबकेश्वर,कोपरगाव, या ८ ठिकाणी उभारणी केली. धर्माची ,देशाची भावी पिढी आधार स्तंभ असलेल्या बालकांना दैवीभूल्यादिष्टीत शिक्षण त्याच बरोबर शालेय शिक्षणासाठी "संस्कार केंद्र " व कार्य प्राचीन व गुरुकुल पध्दतिने सुरु केले.बाबाजींनी आश्रमाच्या ठिकाणी गरीब विद्यार्थी वसतीगृह निर्माण केले. १९९० चा गुरुकुलातील एस.एस.सी. चा निकाल ९७ % लागला आहे.हि परंपरा आज पर्यंत चालू आहे. मनुष्य जन्म हा स्वैराचारासाठी नसून आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे.याचे शिक्षण देतांना परधन,परस्त्री,परनिंदा,परअन्न ह्या चार गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे.ह्यावर त्यांचा भर होता.

आयुष्याचा प्रत्येक क्षण परोपकार लोकशिक्षणासाठी कसा जास्तीतजास्त खर्च करता येईल याचा सतत ध्यास घेतला होता.श्री शिव पंचायतन यज्ञ याग,भव्य जपअनुष्ठान करून समाज जागृती श्री संत जनार्दन स्वामींनी केली.सर्व वयातील पुरुष व मुले या सर्वांकडून सात दिवसीय जपअनुष्ठान करून घेतले.या सात दिवसात धर्माचे,संस्कृतीचे सरळ साध्या सोप्या ग्रामीण भाषेत प्रवचन करून आहार,विहार,सदाचार,धर्मनिष्टा श्री संत जनार्दन स्वामींनी केली. अशा प्रकारे चंदना सारखा देह झिजून झिजून कार्य क्षीण झाला.शरीर शेवटी शरीर आहे जे कार्य सामान्यांना काही शत वर्ष लागले ते कार्य अतिशय अल्प काळात श्री बाबाजींनी करून दाखविले. हा मोठा असामान्य अविष्कार आहे.वयाच्या ७५ व्या वर्षी जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी )महाराज यांनी प्रभू राम चंद्राच्या पद स्परर्शाने पावन झाल्येल्या भूमीत आदर्श राजा मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या तपोभूमीत श्री शर्वाश्वर महादेव मंदिर,नाशिक मंदिराच्या आपल्या पर्णकुटी मध्ये १०.१२.१९८९ रोजी ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मलीन झाले. श्री सद्गुरू माऊलीचे दिव्य देहाची महायात्रा दुपारी ४ वाजता नाशिक शहरातून कोपरगावकडे निघाली.लाखो भाविक साश्रुनयनांनी ह्या महायात्रेत सहभागी झाले होते.कोणी कुणाशी बोलत नव्हते.मुखातून एकच भजन पुन्हा पुन्हा स्वयंप्रेरणेने म्हणत होते.

" हीच आशा एक देवा पुन्हा याला का या गावा " " जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा " " जनार्दन स्वामी माझे आई मजला ठाव द्यावा पायी." कोपरगावला दिनांक ११.१२.१९८९ दुपारी १२ वाजता समाधी सोहळा सुरु झाला,पंचपोचार पूजा व सर्व धार्मिक परंपरेचा विधी पु.प्राणवानंद सरस्वती व अनेक साधूंच्या मार्गदर्शनाने सुरु झाला.हा सोहळा पाहण्यासाठी किमान ४ ते ५ लक्ष लोक हजर होते.माध्यान्हीला येत असलेल्या सूर्य नारायणाचे साक्षीने या ज्ञान सूर्याला अखेरचा विनम्र अभिवादन करून पंच भौतिक पवित्र देह समाधिस्त केला. व आखाड्याच्या नियमाप्रमाणे जगद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी )महाराज अर्थात प.पु.बाबाजींच्या षोडशी सोहळ्याच्या दिवशी दिनांक 25.12.1989 रोजी आखाड्याच्या संत महंताच्या उपस्थितीत व श्री शंभू जुना पंच दशनाम जुना आखाड्याचे सेक्रेटरी श्री शिवगीरिजी महाराज यांच्या शुभ हस्ते उतराधिकारी म्हणून श्री बाबाजींचे आवडते शिष्य श्री स्वामी शांतीगिरीजी महाराज यांना उत्तराधिकारी पदाची शाल पांघरण्यात आली त्या दिवसापासून तर आज पर्यंत गुरु कार्याचा ध्यास घेऊन गुरूंचे कार्य राज्यात नव्हे देशात नव्हेतर जगात पोहचवीण्याचे कार्य ते करीत आहे .

तसेच गुरु कार्याचे मूळ ठिकाणी म्हणजे श्री क्षेत्र वेरूळ ता.रत्नपूर (खुलताबाद) जि.संभाजीनगर (औरंगाबाद) या ठिकाणी प.पु.बाबाजींचे उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी भगवान घृष्णेश्वराच्या पावन व पवित्र सानिध्यात जगद्गुरू जनार्दन स्वामिनी ज्या ठिकाणी बिसामंत्र ची सिद्धी केली अश्या येलगंगेच्या पवित्र तीरावर प.पु.बाबाजींच्या जटा,नखे,व इतर दैनदिन वापरातील वस्तू ठेऊन संकल्पित समाधी मंदिर ज्या ठिकाणी अनेक संकल्प (नवस)सिद्धीस जातात अशी बाबाजींची सिद्धाआसनाची मूर्ती मंदिरात विराजमान आहे.त्याठिकाणी उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने नियोजन चालू आहे.